गुजरातमधून महाराष्ट्राला होणारी दुधाची रसद रोखण्यासाठी राजू शेट्टी कालपासून डहाणू इथं तळ ठोकून होते. मात्र आज गुजरातमधून दुधाचे टँकर आलेच नाहीत.
दूध उत्पादकाला 5 रुपयांचं अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हाती घेतलेल्या दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
मुंबईत जरी जास्त परिणाम जाणवत नसला तरी तिकडे राज्यभर आंदोलन हिंसक होताना दिसतंय. आता या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आक्रमक झालेत.
उद्यापासून जनावरं घेऊन महामार्ग रोखणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. तसंच मुलं-बाळं, महिलांना घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन बसणार, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
पुण्यात तुटवडा
दूध आंदोलनाचा मुंबईत अजूनही फारसा परिणाम जाणवत नसला तरी पुण्यात मात्र दुधाचा तुटवडा भासणार आहे. कारण, आज चितळे आणि कात्रज या पुण्यातल्या मोठ्या दूध डेअऱ्यांचं संकलन होणार नाहीय. त्यामुळे पुण्यात दुधाची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. पुण्याकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या आडवल्या जात आहेत.
जालन्यात दूध रस्त्यावर
तर तिकडे जालन्यात स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी दूध कोंडी केली. आणि रस्त्यावर दूध फेकून दिलंय. जालना औरंगाबाद रोडवरच्या नागेवाडी इथं 4 हजार लीटर दूध फेकून देण्यात आलंय. आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात दूध दर आंदोलन काल रात्री आणखी तीव्र झालं. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकूळ दुधाचा टँकर आंदोलकांनी पेटवला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.