मुंबई: राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. 91 प्रकल्पांसाठी राज्याला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत ही मदत केंद्राकडून दिली जाणार आहे.


राज्यभरातल्या 91 प्रकल्पांसाठी हा पैसा पुरवला जाईल.  यामुळे 3 लाख 77  हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा दावा गडकरींनी केला.

प्रधानमंत्री सिंचन योजनेत राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा समावेश असल्याचं गडकरींनी सांगितलं.

"राज्याला 1 लाख 55 हजार कोटी रूपये मंजूर झाले आहेत. एव्हढी रक्कम प्रथमच राज्याला मिळत आहे. सिंचन हा राज्याचा विषय होता. पहिल्यांदाच पंतप्रधानांनी लक्ष घालून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला.

राज्यातले 40 टक्क्यांपर्यंत जमीन सिंचनखाली येईल. यामुळे आत्महत्या कमी होणार यात शंका नाही. अनेक अर्धवट प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. युद्धपातळीवर काम करण्याचा मानस आहे. मे पर्यंत यापैकी काही प्रकल्पांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली, तर पुढच्या वर्षी आत्महत्यांची प्रकरणं होणार नाही.

पंतप्रधानांनी आउट ऑफ वे जाऊन या सगळ्यासाठी मदत केली. डेड अॅसेट्स म्हणजे नेत्यांची स्मारकं बनली होती. मात्र आता यामुळे महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होईल.धुळे , बुलढाणा, सांगोला, आटपाडी, तसंच प. महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागालाही याचा मोठा फायदा होईल", असं गडकरींनी नमूद केलं.