पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत आहे. ही थंडी लोकांना असह्य होत आहे. अशातच पंढरपूरमधील तावशी या गावातील ग्रामस्थांना सुखद धक्का बसला आहे. या गावात ग्रामस्थांना गारठा सुसह्य व्हावा यासाठी चक्क गरम पाण्याचे ATM सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आंघोळीसाठी लाकूडफाटा गोळा करणारे गावकरी बदल्या घेऊन या ATM जवळ गर्दी करू लागले आहेत.


एका रंगात रंगलेले गाव म्हणून काही दिवसापूर्वी 'माझा'ने प्रकाशात आणलेले हे उपक्रमशील गाव एक दिलाने चालते. म्हणूनच या गावात मंदिरापासून मशिदीपर्यंत सर्वच वास्तू एका रंगात रंगल्या आहेत. गावात मोफत पिठाची गिरणी, स्वच्छ पाणी यासह अनेक योजना राबवणाऱ्या महिला सरपंच सोनाली यादव यांनी गावकऱ्यांसाठी अल्पदरात गरम पाणी उपलब्ध करून दिले आहे.

गावात सोलारवर चालणारा हा गरम पाण्याचा ATM सुरु करण्यात आला आहे. यामध्ये एक रुपयात पाच लीटर तर पाच रुपयात 25 लीटर गरम पाणी मिळते. त्यामुळे तावशी गावातील ग्रामस्थांना कडाक्याची थंडीदेखील सुसह्य झाली आहे.

या गावात सरपंच आणि ग्रामसेविका महिला असल्याने महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी गावात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे गरम पाण्याचे एटीएम. हे एटीएम सुरु झाल्यामुळे गावातील गावकऱ्यांना पाणी तापवण्यासाठी लाकूडफाटा गोळा करावा लागणार नाही. तसेच वृक्षतोड कमी होऊन प्रदूषणही कमी होणार आहे.