औरंगाबाद: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा वा विधानसभेला नसते इतकी चुरस या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहायला मिळते. यातही काही लढती या लक्षवेधी असतात. कुठे भावा-भावांची लढत तर कुठे मुलगा आपल्या बापाच्या विरोधात लढतोय असे चित्र अनेक गावात पहायला मिळते. अशीच एक लक्षवेधी लढत औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात पहायला मिळाली. यामध्ये चक्क सासू विरोधात सुनेने तर सासऱ्याच्या विरोधात जावयाने निवडणुकीत उडी घेतली होती.


या निवडणुकीत सुनेने आपल्या सासूचा तर जावयाने आपल्या सासऱ्याचा पराभव केला आहे. या निकालाची चर्चा राज्यभर केली जातेय.


Gram Panchayat Election Results | अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीत डीजेचा दणदणाट तर कार्यकर्ते थेट जेसीबीच्या पंजात


औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तसेच शिवशाही पॅनलकडून जावई लक्ष्मण काळे हे तर त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य हे छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी प्रत्येकाने आपापल्या विजयाचा दावा केला होता. या चौघांनीही आपण गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सांगत मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी प्रयत्न सुरु केले होते.


पंढरपुरातल्या देवडेत 85 वर्षांच्या कलावती आज्जींची व्हिक्ट्री, विजयानंतर म्हणाल्या...


आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता चार दिवस सासूचे आणि सासऱ्याचे संपून चार दिवस सुनेचे आणि जावयाचे आले असल्याची चर्चा या परिसरात केली जात आहे. आता या निकालाने त्यांच्या नात्यात कडूपणा येऊ नये म्हणजे मिळवलं.


Gram Panchayat Election Results | अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का; नवख्यांच्या हाती सत्ता, महाविकास आघाडीची बाजी