गोदामांमधील कांदा सरकार बाजारभावानं खरेदी करणार
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 08:21 AM (IST)
मुंबई : कांदाप्रश्नावर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे गोदामांमध्ये पडून राहिलेला कांदा केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली. आज कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि इतर नेत्यांमध्ये आज दिल्लीत बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरीही बहुतांश तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता सडायला लागला आहे. त्यातचं आडतबंदीमुळे झालेला संप आणि पावसाच्या फटक्यामुळे कांद्याचा बाजारभावही उतरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा किती फायदा होतो, हे पहावं लागणार आहे.