Mumbai and Pune University Chancellor: राज्याचे राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी आज मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीची घोषणा केली  आहे. मागील काही काळापासून या विद्यापीठांच्या कुलगुरुंची पदे रिक्त होती. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु  असणार आहेत. 


राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज कुलगुरु निवड जाहीर केली.  डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ.  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.


रवींद्र कुलकर्णी हे मुंबईतील माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या काळात डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कारभार सांभाळलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी कारभार सांभाळण्याचा अनुभव असल्याने डॉ. रवींद्र कुलकर्णी हे कुलगुरू निवडीच्या शर्यतीत इतरांपेक्षा सरस मानले जात होते. तर, डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी जानेवारी महिन्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवड समित्या स्थापन केली होती. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी कुलगुरू निवड समिती स्थापन केली होती. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली होती. 


महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिली नव्हती. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. मागील वर्षी राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. 


विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रिया रखडल्याने, विद्यापीठाला शैक्षणिक निर्णय घेण्यात अडचणी येतात, तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा वारंवार अधोरेखित केला जात होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 90 अर्ज आले होते.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI