लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2019 03:01 PM (IST)
दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना दुष्काळात देण्यात येणारी सर्व मदत आताही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आता कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागणार नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांचे पंचनामे ग्राह्य धरणार आहे.

अकोला : विधानसभेच्या रणधुमाळीत 'मी पुन्हा येईल' असं ठामपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता बदलली आहे. ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर गेले आहेत. अवकाळी पावसामुळे हातात आलेला हंगाम नष्ट झाला आहे. ओला दुष्काळ आहे, पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शेतकऱ्यांनी सर्वोतपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली. फडणवीस म्हणाले, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना दुष्काळात देण्यात येणारी सर्व मदत आताही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आता कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागणार नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांचे पंचनामे ग्राह्य धरणार आहे. पंचनामे होऊ शकले नाही म्हणून मदत मिळणार नाही असे होणार नाही. सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारचं. या विषयी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना चांगली मदत हवी असेल तर, 6 तारखेपर्यंत 100 टक्के पंचनामे करण्याचे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले. लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज पडली तर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.