मुंबई : लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील निम्मी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनीने माफ करावे, तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे.


मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले, असल्याची माहिती रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असं आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.


कोरोनाची चाचणी मोफत करावी


वीजबिल माफ करण्यासोबत कोरोनाची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी. सध्या कोरोना चाचणीसाठी पाच हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्याऐवजी मोफत किंवा अल्पदरात कोरोना चाचणी करावी, अशी आपली मागणी असून याबाबत लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.


रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्स यांनाही कोरोनाचे किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेशा सुविधा आरोग्य कर्मचाऱ्यांनाही दिल्या पाहिजेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. कोरोनाला घाबरुन जर खाजगी डॉक्टर घरी बसले तर कोरोनाशी लढा कसा जिंकणार? असा सवाल रामदास आठवले यांनी केला. खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू कारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


संबंधित बातम्या






Coronavirus | लक्षण नसतानाही अनेक जण कोरनाबाधित