नवी दिल्ली : ठाण्यातील प्रदूषण आणि वाढत्या ट्राफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक अनोखा उपाय काढण्यात येणार आहे. मालवाहू ट्रक्सची रेल्वेच्या मालगाडीवरुन वाहतूक सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या संदर्भातली पहिली चाचणी वसई रोड ते कोलाड या मार्गावर यशस्वी झाली आहे.


राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीनं दखल घेत रेल्वे मंत्रालयानं ही सेवा दोन महिन्यांतच प्रत्यक्षात सुरु होईल अशी शक्यता वर्तवली आहे. रो-रो अर्थात रोल ऑन रोल ऑफ असं या वाहतूक प्रकाराला म्हटलं जातं.

अहमदाबाद, आग्रा हायवेवरुन येणाऱ्या सगळ्या गाड्या, शिवाय ठाणे-बेलापूर एमआयडीसीही याच परिसरात वसल्यानं अवजड ट्रक्सची वाहतूक ठाण्याच्या प्रदूषणाचं, ट्रॅफिक जामचं प्रमुख कारण ठरलं आहे. त्यावर उपाय म्हणून वसई रोड इथूनच या अवजड वाहनांना रेल्वेच्या वाघिणीवर बसवून भिवंडी, पनवेल, उरण या मार्गानं जेएनपीटी बंदरापर्यंत नेण्यात यावं असा हा प्रस्ताव आहे.

वसई रोड ते कोलाड या 150 किमी मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. साडेचार तासात हे अंतर मालवाहू ट्रक्ससह मालगाडीनं पार केलं. यावेळी ट्रेनवर चढवलेले मालवाहू ट्रक असं एक वेगळं दृश्य यानिमित्तानं लोकांना पाहायला मिळालं. अवजड ट्रकची अशी वाहतूक सध्या कोकण रेल्वेच्या माणगाव पासून सुरु होणाऱ्या ट्रॅकवर उपलब्ध असल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं.

भिवंडी हे महाराष्ट्र सरकारसाठी गोदामांचं शहर म्हणून विकसित होत आहे. लवकरच भिवंडीमधल्या गोदामांची संख्या 50 हजारापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे जवळपास 4 ते 5 लाख अवजड वाहनांची भर पडून ट्रॅफिक 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करता हा उपाय रेल्वेनं योजनं महत्वाचं असल्याची माहिती आहे.