अमरावती : दिनदुबळ्या माणसांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करुन झगडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक असलेले धडाकेबाज आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत मोर्चाचं आयोजन केलं होतं.

संत गाडगे महाराज मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. या मोर्चात दूरदूरवरुन शेतकरी, शेतमजूर आणि आमदार बच्चू कडू यांच्याप्रती प्रेम असणाऱ्या दिनदुबळ्यांनी सहभाग घेतला होता. जवळपास 25 हजाराहून अधिक लोकांनी या मोर्चात हजेरी लावली होती.

amt bacchu kadu 1


आमदार बच्चू कडू यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयाजवळ आल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवणूक केली. मात्र, शेतकऱ्यांनी हे बॅरिकेट्स हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्यांवर पाण्याचा वर्षाव केला आणि त्यानंतर अंदाधुंद लाठीमार केला.
धक्कादायक म्हणजे लाठीमार करताना पोलिसांनी महिला आणि लहान मुलंही पाहिली नाहीत. यामध्ये मोर्चात सहभागी झालेल्यांमधील 15 कार्यकर्ते जखमी झाले आहे. पोलिसांनी लाठीमाराची सुरुवातच महिलांपासून केल्याचीही माहिती मिळते आहे.

पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध म्हणून आमदार बच्चू कडू हे याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत.



शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी, हक्कांसाठी काढलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आमदार बच्चू कडू यांनी निषेध नोंदवला आहे. शिवाय, शेतकऱ्यांचा मोर्चा अशाप्रकारे दडपण्यासाठी पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर लाठीमार केल्याचा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या मोर्चाचा व्हिडीओ :