ऐन लग्नसराईत सोनं महागलं, ग्राहकांची निराशा
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2019 06:09 PM (IST)
ऐन लग्नसराईत सोने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. अक्षयतृतीयेपर्यंत काही दिवस सोन्याच्या दरात अल्प प्रमाणात घसरण होत होती. परंतु अक्षयतृतीयेनंतर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
मुंबई : ऐन लग्नसराईत सोने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. अक्षयतृतीयेपर्यंत काही दिवस सोन्याच्या दरात अल्प प्रमाणात घसरण होत होती. परंतु अक्षयतृतीयेनंतर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचा भाव वाढत-वाढत तोळ्यामागे 33 हजारावर पोहोचला आहे. या एकाच आठवड्यात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान सोन्याच्या किंमतीत जरी वाढ झाली असली तरी सोने खरेदीचे प्रमाण मात्र घटलेले नाही. लग्नसराईचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची पावलं सराफा बाजाराकडे वळत आहेत. दरम्यान सोन्याचा भाव वधारला असताना चांदीच्याही दरात अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. चांदीचा दर आता 40 हजार रुपये किलो इतका झाला आहे.