मुंबई : टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाने पंढरपूर दुमदुमू लागलंय. आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे. मात्र आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

आशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी परंपरा लाभलेला हा महामेळा मोठ्या भक्तीभावाने शेकडो वर्षांपासून सुरु आहे. हा भक्ती मेळावा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

शिवरायांच्या शिकवणीचा आदर्श आज संपूर्ण जग घेत असताना राज्य आणि केंद्र सरकारनेही शिवरायांच्या आदर्श विचारांनुसार सर्वांना समान न्याय देण्याच्या भावनेतून तातडीने पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं उदयनराजे आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काहीही झालं तरी आपल्या वारीची जाज्वल्य आणि स्फूर्तीदायी परंपरा निर्धोकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान द्यावं, असं आवाहन उदयनराजेंनी केलं.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा न करु देण्यावर मोर्चेकरी ठाम

जेव्हा मनोहर जोशी, अजित पवार यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखलं होतं...