रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीमधील एक्सेल कंपनीतून रात्री वायुगळती झाली. या घटनेमुळे लोटे एमआयडीसी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


एक्सेल कंपनीतून वायुगळती झाल्याने एमआयडीसी परिसरात अचानक धुकंसदृश वायू पसरल्याने लोक घाबरले. हा वायू वेगाने परिसरात पसरल्याने लोकांची धावपळ उडाली. वायू एक्सेल कंपनीतून येत असल्याचे लक्षात येताच लोकांनी कंपनीकडे धाव घेतली.

एक्सेल कंपनी प्रशासनाबाबत कोणतीच माहिती देत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. कंपनीच्या गेटसमोर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली. कंपनीतून वायुगळती झाल्यानंतरही कंपनीतून कोणत्याच प्रकारच्या सूचना देण्यात न आल्याने लोकांच्या संतापात भर पडली.

दरम्यान, लोटे एमआयडीसीत अशा घटना वारंवार होत असताना, प्रदूषण नियंत्रण विभाग आणि अन्य विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने लोकांची नाराजी वाढत आहे. सुदैवाने आजच्या वायुगळतीमुळे कोणालाही त्रास झाला नाही.