पनवेल : पनवेल शहरात ‘कचराकोंडी’ झाली आहे. पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या भांडणाचा त्रास सामान्य पनवेलकरांना सोसावा लागतो आहे. या भांडणामुळे पनवेलमध्ये पुन्हा एकदा कचरा प्रश्न निर्माण झाला आहे.


पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोना कचरा उचलण्याबाबात पत्राद्वारे पालिकेला कळवलं. मात्र, पत्राला प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सिडकोने तीन दिवसांपासून कचरा उचलण्याचंच बंद केलं आहे.

खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात सगळीकडे कचरा पडला असल्याने रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान आता पुढील तीन महिन्यांमध्ये कचरा व्यवस्थापन महापालिकेने उभा करण्यासाठी सिडकोने वेळ दिला असून, आज पासून कचरा परत सिडको उचलणार आहे. मात्र, सध्या तरी शहरभर कचरा अजूनही मोठ्या प्रमाणात पडून आहे. या कचऱ्यामुळे पनवेलमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

कचरा उचलण्यास सुरुवात झाली असली तरी कचऱ्याचे ढीग आणि त्यात पावसाळा, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या सर्व वादात सत्ताधारी भाजप कुठे आहे, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. कारण या दुर्गंधीने पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.