औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गेल्या 8 दिवसांपासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे 15 लाख नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे कचरा डेपोच नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.


औरंगाबादमधील हा कचरा नारेगाव इथल्या कचरा डेपोमध्ये टाकला जायचा. त्यामुळे नारेगावमधील नागरिकांचं आरोग्य गेल्या 40 वर्षांपासून धोक्यात आहे. औरंगाबादमधील हा कचरा नारेगावातील डेपोत टाकू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. पर्यायी जागा उपलब्ध करुन घेण्यात औरंगाबाद महापालिकेला अपयश आलं आहे.

गेल्या आठ दिवसात अंदाजे साडेतीन हजार टन कचरा शहरात ठिकठिकाणी साचला आहे.  परिस्थिती गंभीर बनत असल्यामुळे महापालिकेनं डॉक्टरांच्या रजाही रद्द केल्या आहेत. तसंच सर्वसामान्य औरंगाबादकर तसंच खासगी रुग्णालयांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

कचराकोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

शहरातील कचऱ्याचे ढीग  लवकरात लवकर उचलावे, यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आज महानगरपालिकेच्या इमारतीसमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कचरा फेकला आणि महापालिकेने शहरातील कचरा प्रश्न लवकर मार्गी याची मागणी केली. येत्या दोन दिवसात शहरातील कचरा उचलला गेला नाही, तर आंदोलन तीव्र करु असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.