औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी एकत्र येत ‘गार्बेज वॉक’चं आयोजन केलं होतं. दोन महिने होत आले तरी अजूनही कचऱ्याच्या प्रश्नावर म्हणावा तसा तोडगा निघू शकला नाही.


औरंगाबाद शहरातील अनेक भागात अजूनही कचरा कायम आहे, तर कचऱ्यावर प्रोसेसिंग सुद्धा अजूनही होऊ शकली नाही. याचाच निषेध करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत पैठण गेट ते महापालिका कार्यालयापर्यंत गार्बेज वॉक केला.

कचऱ्याच्या या प्रश्नामुळे ऐतिहासिक शहराचे नाव धुळीस मिळाले आहे, नागरिकांना याचा त्रास होत असताना प्रशासन आणि राजकीय नेत्यांना कसलीही चिंता नाही, अशी खंत नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. अजून किती दिवस कचरा प्रश्न सुटणार नाही, असा प्रश्नही नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.

मार्च महिन्यात औरंगबादमधील कचराप्रश्न पेटला होता. नागरिक रस्त्यावर उतरले होते. मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड केली आणि त्या पेटवून दिल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. नागरिकही जखमी झाले होते आणि पोलिसही. शिवाय वाहनांचेही मोठे नुकसान या आंदोलनादरम्यान झाले होते. जवळपास महिनाभर आंदोलन चाललं.