सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित कृषीभूषण गणेश कुलकर्णी यांच्या हत्याकांडातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा  निकाल दिला आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.


 
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे उपसरपंच गणेश कुलकर्णी यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 
नोव्हेंबर 2011 मध्ये उपळाई गावात गणेश कुलकर्णींची हत्या झाली होती. कुलकर्णी रोज सकाळी शेतात फिरायला जात असत, त्याचवेळी त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. राजकीय द्वेषापोटी गणेश कुलकर्णींची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता.

 
गणेश कुलकर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज राजकीय नेत्यांच्या समर्थकांना हरवून गावात सत्तेत आले होते. उपसरपंच म्हणून त्यांनी विकास कामांना चालना दिली होती. त्यांची वाढती लोकप्रियता प्रस्थापित राजकीय नेत्यांना रुचत नसल्याने हा खून झाला असावा अशी शंका त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी व्यक्त केली होती.

 
उत्कृष्ट शेती केल्याबद्दल गणेश कुलकर्णी यांना कृषिभूषण पुरस्कार मिळाला होता. माढा जिल्हा परिषद जागेसाठी त्याचं नाव चर्चेत आलं होतं. लोकांच्या हितासाठी झटणारा तरुण प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.