गडचिरोली : गडचिरोलीमधील जांभूळखेडा येथे 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात 15 पोलीस शहीद झाले. याप्रकरणी कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या नक्षलींविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंपनी चारचा प्रभारी प्रभाकरसह इतर 40 अज्ञात नक्षलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात गडचिरोलीमध्ये मतदान झाले होते. नक्षलींनी स्थानिक नागरिकांना मतदानावर बहिष्कार घालण्यास बजावले होते. परंतु नक्षलींना न जुमानता मतदारांनी भरभरुन मतदान केलं. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत गडचिरोलीमध्ये अधिक प्रमाणात मतदान झाले होते. याच रागातून नक्षलींनी सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केल्याचं म्हटले जात आहे. गेल्याच वर्षी सी 60 पथकाने मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन करुन नक्षल्यांचा खात्मा केला होता. याच रागातून नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला होता.

नक्षलींना चकवण्यासाठी 15 जवान दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.