मुंबई : एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसह वर्षातील सहा महिने मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. अखेर दिवाकर रावतेंनी मागणी मान्य करुन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गणेश आगमनाच्या मुहूर्तावर 'सुख वार्ता' दिली.


एसटी महामंडळाचे सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे चार हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या 25 हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पाससाठी मागणी केली आहे.

सेवेमध्ये असताना दररोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष देता न आल्याने, किमान निवृत्तीनंतर तरी कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालवावेत, सपत्नीक धार्मिक-पर्यटन, देवदर्शन, नातेवाईकांना भेटावे यासाठी प्रवास हा अनिवार्य आहे. परंतु परिस्थिती अगदीच बेताची असल्याने दळण-वळणासाठी एसटी शिवाय पर्याय नाही. ज्या एसटीची ऐन  उमेदीत प्रामाणिक सेवा केली. त्या एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची 'सशुल्क' का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी परिवहनमंत्र्यांकडे केली होती.

एकेकाळी एसटीच्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या व गेली 70 वर्षे ज्या कर्मचाऱ्यांनी मनोभावे सेवा करुन एसटी सांभाळली, वृद्धिंगत केली, त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तर वयात 'सशुल्क' प्रवास-पास न देता वर्षातून सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे.

या निर्णयाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजीत सिंह देओल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान राखत संमती दिल्याने, रावते यांनी त्यांचे आभार मानले आहेत.