Nagpur News : राज्य सरकारने महानगरपालिकेचा (NMC Recruitment) 17 हजार पदांचा आकृतिबंध मंजूर केला. या आकृतिबंधानुसार भरती केल्यास महानगरपालिकेवर महिन्याला 50 कोटींचा ताण पडणार आहे. मागील युती सरकारने आकृतिबंध मंजूर करताना उत्पन्नाचा विचार करून पदभरती करण्याची अट ठेवल्याने नवीन पदभरतीत अडथळा निर्माण झाला आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे शहरातील विकासकामे, दुरुस्तीच्या कामांनाही खीळ बसली आहे. 


महानगरपालिकेत दर महिन्याला 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असून अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी तयार केलेला आकृतिबंध गेल्या चार वर्षांपासून धूळखात पडला आहे. एकीकडे नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 75 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे महानगरपालिकेतील भरतीचा मुद्दाही ऐरणीवर आला. शहरातील महानगरपालिकेचा 17 हजार पदांचा आकृतिबंध धुळखात पडला आहे.


चार वर्षांपूर्वी फडणवीसांनीच दिली होती मंजूर


युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच या आकृतिबंधाला मंजुरी दिली होती. परंतु उत्पन्नानुसारच पदभरती करण्याचा शेराही मंजुरीसोबत मारण्यात आला होता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र, उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. मालमत्ता कराची थकबाकीच जवळपास सातशे कोटींच्या घरात आहे. नव्या उत्पन्नाचे स्त्रोतही शोधण्यात महानगरपालिका अपयशी ठरली. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची उत्पन्न वाढीबाबतची उदासीनता आणि राज्य सरकारच्या अटीमुळे नागपूर महानगरपालिकेची पदभरती रखडली आहे. याचा परिणाम शहरातील आरोग्य, पायाभूत सुविधा, विकासकामांवर झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांकडे अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या, अशी त्यांची अवस्था झाली आहे. 


प्रलंबित आकृतिबंधाप्रमाणे...


धूळखात पडलेल्या आकृतिबंधात पदांची संख्या 17 हजार 334 आहे. यात उपायुक्तांची 7, शहर अभियंता 9, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 28, प्रकल्प व्यवस्थापक 1, उपअभियंता (स्थापत्य) 94, कनिष्ठ अभियंता 302, निरीक्षक 233, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 448, मलेरिया सर्व्हे वर्कर 100, सुरक्षा रक्षक 440, क्षेत्र कर्मचारी 500, रोड सफाई कर्मचारी 8660, पोलीस कॉन्स्टेबल 45 यासह अन्यपदांचा संख्येतही वाढ करण्यात आली आहे.


अग्निशमनमधील भरतीही रखडली


अग्निशमन विभागाच्या 872 पदाचा आकृतिबंध शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप पदभरती झालेली नाही. केवळ 218 कर्मचाऱ्यांवर आपातकालीन मदत पोहोचविण्याची जबाबदारी आहे. यातही 19 निवृत्त अग्निशमन कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहेत. याशिवाय अनेक अग्निशमन अधिकारी, कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. हे निवृत्त अग्निशमन कर्मचारी आपातकालीन स्थितीत तात्काळ प्रतिसाद कसा देतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


मनपा आयुक्तांचा नेहमीप्रमाणे 'नो रिसपॉन्स'


आकृतिबंधातील अटी प्रमाणे आस्थापना खर्च कमी करा किंवा उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे सांगण्यात आले होते. या संदर्भात मनपाने गेल्या चार वर्षातील या संदर्भात केलेल्या कारवाई संदर्भात प्रतिक्रीयेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला असता. त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


NMC on feeding stray dogs : मोकाट कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यास 200 रुपयांचा दंड; मनपाकडून परिपत्रक जारी