नागपूर : उपराजधानी नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ नागपूरकरांवर आली आहे. कारण, गेल्या 48 तासात शहरात विविध प्रकरणातून चार जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनांमुळे नागपूरचे रहिवासी दहशतीखाली जीवन जगत आहेत.


पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडाने नागपूरकर सावरले नसताना पुन्हा एकदा गुन्हेगारांनी शहरात थैमान घातलं आहे. हत्या, लूट, घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असताना गेल्या दोन दिवसात हत्येच्या चार घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काही घटना कौटुंबीक वादातून घडल्या आहेत, तर काही घटना गुंडांमध्ये संघर्षाचे परिणाम आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच पोलीस नागरिकांना सुरक्षेची हमी देण्यासाठी अपयशी ठरताना दिसत आहेत.

गेल्या 48 तासात चार जणांची हत्या

पहिली घटना : रविवारी दुपारी एमआयडीसी परिसरात नागलवाडी येथे एका अज्ञात तरुणीचा हत्या करून फेकलेला मृतदेह आढळला. या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही.

दुसरी घटना : रविवारी रात्री एमआयडीसी परिसरात राजीवनगरात कृष्णा सुखारी प्रसाद (19 वर्ष) या युवकाची गुंडांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली होती.

तिसरी घटना : काल रात्री कोराडी परिसरात मंगेश भोयर (35 वर्ष) या दूध विक्रेत्याची शेजाऱ्याने हत्या केली. शेजाऱ्यासोबत जागेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

चौथी घटना : गणेशपेठ परिसरात धीरज विंचुलकर (40 वर्ष) या व्यक्तीची त्याच्याच भावाने कौटुंबीक वादातून हत्या केली. धीरजला राहत्या घरी त्याचाच लहान भाऊ पंकजने डोक्यावर दगड घालून जीवे मारलं.