Anil Deshmukh अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काल (ता. 2 मार्च)  नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये बॉम्ब ठेवणारा मास्टर माईंड कोण होता. याबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. तसेच माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता असून वेळ आल्यास त्याचे नाव देखील सांगेन, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा अनिल देशमुख यांनी मोठे वक्तव्य करत थेट गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.


आपल्याला चांदीवाल आयोगानं 'क्लिन चीट' दिली असल्याची माहिती गृहमंत्री फडणवीसांना असल्यानेच त्यांनी हा अहवाल दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेय. 


खोटं शपथपत्र देण्यामागे भाजपच्या बड्या नेत्याचा दबाव


दरम्यान, तीन वर्षांपूर्वी परमवीरसिंगांच्या (Parambir Singh) आरोपांनंतर विदर्भातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं आपल्यावर खोटं शपथपत्र देण्यासाठी दबाव टाकला होता. आपण त्यांनी सांगितलं तसं शपथपत्र दिलं असतं तर तेंव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असा गौप्यस्फोट देखील अनिल देशमुखांनी केलाय. मी नकार दिल्यानंतर माझ्यावर छापे आणि इतर कारवाई करण्यात आली. या कारवाई मागे नेमके कोण हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र त्या नेत्याचं नाव सांगायला त्यांनी नकार दिलाय. पुढे ते म्हणाले, आपल्याला चांदीवाल आयोगानं 'क्लिन चीट' दिली असल्याची माहिती गृहमंत्री फडणवीसांनी असल्यानेच त्यांनी हा अहवाल दडवून ठेवला आहे. आपला अहवाल ज्या कपाटात दडवून ठेवलाय त्या कपाटाच्या दोन-तीन किल्ल्या  असल्याचा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावलाय. या किल्ल्या मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री आणि इतर काही जणांच्या ताब्यात असल्याचं देखील ते म्हणाले. 


प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले पाहिजे आणि ते कायम आमच्या सोबतच राहतील, असा विश्वासही अनिल देशमुखांनी व्यक्त केलाय. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र बसून यातून मार्ग काढतील. ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार, त्या पक्षाला जागा हा मविआचा फार्म्युला आहे. लवकरच यातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या