पालघर : धबधब्यावर पोहोण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी जाणं तरुणांच्या जीवावर बेतलं आहे.  जव्हारपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जव्हार बाजरपेठ बंद असल्याने, अंबिका चौक येथील 13 तरुण काळमांडवी धबधब्यावर बाईक घेऊन पोहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तसेच हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठ मोठे पाण्याचे डोह आहेत. मात्र येथे गेलेल्या यातील काही तरुणांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मृत्यांची नावे


निमेश पटेल, देवेंद्र (बाळा) फलटणकर, देवेंद्र(दादू) वाघ, प्रथमेश चव्हाण, जय(रिंकू) भोईर अशी मृतांची नावं आहेत. हे पाचही तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह अग्निशमन दल, एनडीआरएफ यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करत आहेत.