Maharashtra Govt Formation | पाच वर्षांपूर्वी 31 ऑक्टोबरला शपथविधी, यंदा मुहूर्त कधी?
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2019 12:03 PM (IST)
शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.
मुंबई : आजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजे 31ऑक्टोबर 2014 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला. निकाल लागून आज बरोबर आठ दिवस झाले. मात्र अद्यापही शपथविधीचा मुहूर्त ठरत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे. पाच वर्षांपूर्वी जेवढ्या सहज भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य झालं होतं, तितकं सोपं यंदा नाही. बहुमत न मिळाल्याने भाजपला इतर पक्षाची साथ घ्यावीच लागणार आहे. शिवसेना हा त्यांचा युतीमधील पक्ष आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पॉवर वाढलेले शिवसेना पक्ष समसमान मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. खरंतर महाराष्ट्रासोबत हरियाणाचा निकाल जाहीर झाला. पण तिथे चार दिवसांपूर्वी शपथविधी होऊन सरकार कामाला लागलं. राज्यात मात्र अद्यापही सत्तेचा घोळ कायम आहे.