पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.


हिंदूंचा अवमान करणाऱ्या शार्जीलवर तात्काळ कठोर कारवाई करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


सदर प्रकरणी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना तक्रारदार प्रदीप गावडे यांनी महत्त्वाची माहिती दिली. शरजील उस्मानीनं हिंदुंच्या भावना दुखावणारं आणि भारतीय संघराज्याच्या विरोधात घृणास्पद अशा आशयाची वक्तव्य केली होती. या दोन्ही वक्तव्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर स्वारगेट पोलीसांनी याचा रितसर एफआयआर नोंदवण्यात आल्याचं सांगत अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती दिली.


फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


हिंदू समाजाबद्दल केलेले अपमानकारक, आक्षेपार्ह आणि गंभीर वक्तव्य पाहता आणि त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाईच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी शरजीलवरील कारवाईची मागणी करण्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं.


हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं होतं.