परभणीत शेतकऱ्याच्या 18 वर्षीय मुलाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2017 10:04 PM (IST)
परभणी तालुक्यातील बोरवंड गावात एका शेतकऱ्याच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परभणी : परभणी तालुक्यातील बोरवंड गावात एका शेतकऱ्याच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून शेतकऱ्यांपाठोपाठ तरुण मुलंही आत्महत्येचं पाऊल उचलू लागल्यानं आता ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. नापिकीमुळे शेतीतील पीक वाया गेले. तसंच वडिलांवर असणारं कर्ज, यामुळे आता घराचा खर्च वडील कसा चालवणार? या विवंचनेत शेतकऱ्याच्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं. बोरवंड गावात राहणाऱ्या लखन गिराम असं या तरुणाचं नाव असून तो केवळ 18 वर्षाचा होता. वडिलांनी शेतात लावलेले पीक वाया गेले यामुळे या निराश झालेल्या लखननं आत्महत्या केली असल्याचं त्याच्या चुलत भावाने पोलीस फिर्यादीत म्हटलं आहे . लखनच्या घरात वडील, आई आणि मोठा भाऊ असा परिवार असून एक विवाहित बहीण आहे. दरम्यान, त्याच्या वडिलांवर नेमकं किती कर्ज आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.