माढा (सोलापूर) : सिना पाण्याअभावी डोळ्यांसमोर पीक वाळत असल्याचे पाहून नैराश्येतून माढ्यातील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. माढा तालुक्यातील सापटणे भोसेमधील जालिंदर महादेव सुतार या शेतकऱ्याने आत्महत्या केली.


माढा उपसा सिंचन योजनेचे हक्काचे पाणी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे न मिळू शकल्याने जगायचं आधार म्हणून लावलेले कडवळ डोळ्यासमोर वाळू लागले. चिंता वाढल्याने निराश झालेल्या सापटणे भोसे येथील जालिंदर महादेव सुतार या शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा अंत केला.

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सुतार जीवनयात्रा संपवली. एका बाजूला संपूर्ण कर्जमाफीसाठी राजकारण सुरु असताना जगण्याची सगळीच आशा संपलेला बळीराजाचा मात्र आता कोणावरच विश्वास न राहिल्याने मरणाला कवटाळू लागला आहे.

सिना माढा उपसा सिंचनचे पाणी टेल टू हेड येणे गरजेचे असताना अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे टेल भागात पाणीच न आल्याने शेतातील भुईमूग व कडवळ जळू लागल्याच्या निराशापोटी सुतार यांनी मरणाला जवळ केले.

नापिकीमुळे सुतार यांचेकडे सोसायटीचे 2 लाखाचे कर्ज थकीत होते. त्यामुळे कर्जाचा हप्ताच फेडता आला नव्हता. यातच सिना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणीच न मिळाल्याने याहीवर्षी शेतातील पिकं जळू लागली होती.

आता पाण्याचे नियोजन व्यवस्थित न करणाऱ्या पाटबंधारे अधिकाऱ्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाणेकर यांनी तहसिलदाराकडे  केली आहे. सुतार यांच्या पश्चात दोन मुले, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.