पत्नीला विहिरीत ढकलून पतीचीही आत्महत्या, कारण अस्पष्ट
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2017 03:11 PM (IST)
जालना : जालना जिल्ह्यात पत्नीची हत्या करुन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राम रणमळे नावाच्या शेतकऱ्यानं पत्नी रत्नमाला हिला विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केली. रणमळे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून, त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. गेल्या काही दिवसांत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय तरुणीनं शेतकरी वडिलांना लग्नासाठी पैसे मिळत नसल्यानं आत्महत्या केली होती.