राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी एक एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या, मात्र 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती.
मुख्यमंत्र्यांनी 2001 ते 2016 या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
http://csmssy.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. कर्जमाफीच्या अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अर्ज भरताना शेतकऱ्यांना आधार नंबरच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने किंवा वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून आपलं प्रमाणीकरण करावं लागणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा बँक किंवा सबंधित राष्ट्रीयकृत बँक यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी https://csmfs.mahaonline.gov.in/PDF/CSMFS_User_Manual.pdf या लिंकला भेट द्या.