मुंबई : मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत या स्थानकादरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने रेल्वे प्रशासनाने 30 नोव्हेंबर पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे म्हणून एसटी महामंडळातर्फे नियमित फेऱ्यांशिवाय मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर 70 जादा बस सोडण्यात येणार आहे.


मंकी हिल ते कर्जत या स्टेशनच्या दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा एक महिन्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या घाटात अनेक वेळा तांत्रिक बिघाड किंवा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यासाठी उपाय म्हणून मध्य रेल्वे या मार्गावर मेगाब्लॉक घेऊन काम करणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत हे काम सुरू राहील असा अंदाज आहे. यादरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, मुंबई पंढरपूर मुंबई एक्सप्रेस, मुंबई विजापूर मुंबई एक्सप्रेस, पनवेल पुणे पनवेल पॅसेंजर आणि पनवेल नांदेड पनवेल साप्ताहिक एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. याबरोबरच 22 एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेस, एलटीटी हुबळी एलटीटी एक्सप्रेस या गाड्या 31 नोव्हेंबर पर्यंत पुणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. तर भुसावळ पुणे भुसावळ ही गाडी दौंड मार्गे चालवण्यात येणार आहे. या मार्गावर 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता मात्र या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्याने पुढील एक महिना हा ब्लॉक राहील. यामुळे दिवाळीचे निमित्त साधून मुंबई बाहेर गेलेल्या अनेक प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

शिवनेरी बस वाहतुकीचे मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी 278 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच 36 निमआराम वाहतुकीच्या फेऱ्या मुंबई-पुणे मार्गावर सुरु आहेत. याबरोबरच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणे मार्गे जाणाऱ्या 290 फेऱ्या उपलब्ध आहेत. म्हणजेच पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज 465 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे विभागाने - 20, मुंबई विभागाने- 15, पुणे विभागाने- 15, शिवनेरी बससेवेच्या-20 अशा 70 जादा फेऱ्यांचे दररोज नियोजन केले आहे. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाश्याच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनांनं दिली आहे.