मुंबई : एमआयडीसी घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशीत उद्योगमंत्री सुभाष देसाईंसोबत तत्कालीन मंत्रीही चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. चौकशी समितीची व्याप्ती वाढवण्यात आली असून तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे, राजेंद्र दर्डा यांच्याकडूनही चौकशी समितीने जमीन व्यवहारांचे अभिप्राय मागवले आहेत.


उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर इगतपुरीतल्या गोंदे येथील एमआयडीसीची जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. सुमारे बारा हजार हेक्टर जमीन एमआयडीसीकडून पुन्हा विकासकाला देण्यात आली, यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांनी आरोप केल्यानंतर तातडीने चौकशी समिती नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार गृहखात्याचे निवृत्त अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या समितीमार्फत चौकशी सुरु आहे.

राज्य सरकारने आखून दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे 2002 पासूनच्या प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. जमिनी खुल्या करण्याबाबत ज्या मंत्र्यांच्या काळात निर्णय घेण्यात आले त्यासंबंधित मंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. त्यामध्ये तीन माजी उद्योगमंत्र्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.