मुंबई : सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचवण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी मोहीम हाती घेतली आहे. एबीपी माझानेही हा प्रश्न उचलून धरला होता. याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घेतली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.


आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.


केंद्रीय मंत्री गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी - कोल्हापूर - मिरज - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.


400 वर्षे जुन्या वटवृक्षाची कत्तल वाचवण्यासाठी सांगलीत उभे राहिले 'चिपको आंदोलन'


हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा 


मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून देखील जातो. मोजे भोसे गावातील गट क्र. 436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे 400 वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे.


नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या -हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


Shetkari Karjmukti Yojna | सांगलीतील 141 शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती योजनेचा गौरफायदा