Aditya Thackeray Ayodhya Visit Update : शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) जाणार आहेत. पण यापूर्वी काही शिवसेना नेते अयोध्येसाठी रवाना होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत अयोध्येला जाणार आहेत. राऊत यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई असे एकूण 15 जण अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, 15 जूनला रामलल्लाचं दर्शन घेऊन आदित्य ठाकरे शरयू किनारी आरती करतील अशी माहिती राऊतांनी दिली आहे.


सध्या राज्याच्या राजकारणातील भोंग्यांचं राजकारण अजुनही क्षमलेलं नाही. त्यातच अयोध्या दौऱ्याच्या चर्चाही ताज्याच आहेत. पायावरील शस्त्रक्रियेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौरा स्थगिती केला होता. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासोबतच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण आदित्य ठाकरे नेमकं कोणत्या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. अशातच आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची निश्चित तारीख समोर आली आहे. आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 


आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "15 जून रोजी आम्ही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात अयोध्येला जाणार आहोत. महाराष्ट्रातून काही नेते जातील. मोठं वातावरण करायचं नाही. अयोध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तीप्रदर्शन करणार नाही.", असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.


काश्मिर रक्तबंबाळ आहे आणि सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करता?, राऊतांचा सवाल 



काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली. त्यावर बोलतना संजय राऊत म्हणाले की, "आठ वर्ष कसली साजरी करतायत? तिथे काश्मीर रोज हिंदूंच्या रक्तानं भिजून जातोय. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो काश्मिरी पंडित मुलाबाळांना घेऊन पलायन करत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकार भाजपाचं आहे. तुम्ही ताजमहाल, ज्ञानवापी मशिदीच्या खालचं शिवलिंग शोधताय. भाजपाला टीका करायला काय जातंय. काश्मिरी पंडित मरतायत त्याकडे पाहा. त्यावर बोला. टीका कसली करताय? 1990 साली काश्मिरी पंडितांचं हत्याकांड झालं, पलायन झालं तेव्हाही भाजपाच केंद्रात सत्तेत होती. आजही भाजपाच सत्तेत आहे." 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :