मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपने आता देवेंद्र फडणवीसांचे कँपेन सुरू केल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 'देवाभाऊ' असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचसोबत वृत्तपत्रांमध्येही तशा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यावर एकनाथ शिंदेंनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही असं शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत राज्य शासनाने तीन महत्त्वाचे जीआर काढले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उपसमितीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. यावर मनोज जरांगे यांनीही समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
मुंबई-ठाण्यात भाजपची बॅनरबाजी
मराठी आरक्षणासंबंधी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि ठाण्यात देवाभाऊ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.
यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो दिसतो. या बॅनरवर फक्त 'देवाभाऊ' एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. तर राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही देवाभाऊ असा उल्लेख असलेल्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्याचं दिसत आहे.
'कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस' असा बॅनरवर मजकूर लिहण्यात आला आहे. 'छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा, देवाभाऊ....' असंही बॅनरवर लिहलं आहे.
हे बॅनर नेमके कुणी लावलेत हे कळू शकलेलं नाही. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत तीन जीआर काढल्यानंतर भाजपने ही बॅनरबाजी केल्याची चर्चा आहे.
आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही
मुंबई आणि ठाण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागल्यानंतर त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, दोघांनाही न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली आहे. आता देवेंद्रजी आणि आम्ही, एक टीम म्हणून काम सुरू केलं आहे. यापुढे असंच वेगाने काम आम्ही करणार आहोत. सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे."
ही बातमीव वाचा: