मुंबई : विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हे कसलं सरकार, असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.


शालेय पोषण आहार साहित्य वितरणाच्या व्यवहारांची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करू, असं विनोद तावडे यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितलं

मात्र तावडे यांच्या या विधानावर एकनाथ खडसेंनी आक्षेप घेतला. तुम्ही मंत्री आहात, मग शिफारस कशी करता, एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांकडे शिफारस करू म्हणतो, हे चुकीच आहे. हे कसलं सरकार?, असा थेट सवाल खडसेंनी तावडेंना केला.

तुम्ही शिफारस न करता एसआयटी चौकशीची घोषणा करा, अशी मागणीही खडसे यांनी यावेळी बोलताना केली.

शालेय पोषण आहार साहित्य पुरवण्यासाठी ठराविक ठेकेदारांनाच काम कसे मिळते, तेच तेच ठेकेदार भाग्यवान कसे ठरतात, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.

ठेकेदार मुलांच्या जीवाशी खेळत असून याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही खडसे यांनी केली होती.

वीज प्रश्नावर खडसेंचा सरकारला सवाल

दरम्यान 29 मार्चला विधानसभेत खडसेंनी फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता, जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही, असा सवाल खडसेंनी विचारला होता.

एकनाथ खडसे यांचे घायाळ करणारे पाच प्रश्न

  1. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भाच्या शेतकऱ्याला 24 तास वीज, मग अन्य शेतकऱ्यांना का नाही?

  2. शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का, रात्रीची पेरणी करता येईल का?

  3. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन देणार का?

  4. राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय?

  5. उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एखादा कारखना उभा राहिला का?


संबंधित बातमी : खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!