वर्धा : बर्ड फ्ल्यू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला तो थांबवला पाहिजे. देशात बर्ड फ्ल्यूनं आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्ल्यूनं एकही माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या. शोधणाऱ्याला मी ताबडतोब रोख बक्षिस देईलं, असं पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. चीकन, अंडी खाल्ल्यानं कोरोनावर मात करण्यास शक्ती मिळतेय, असंही मंत्री सुनील केदार म्हणाले आहेत.


वर्धा येथील जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सुनील केदार यांनी हे वक्तव्य केलं. बर्ड फ्ल्यू बद्दल राज्य शासन संवेदनशिल आहे. बर्ड फ्ल्यूमुळे सर्वात मोठं नुकसान राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं होतं. बर्ड फ्ल्यूचा फटका शेतकऱ्यांच्या स्वयंरोजगार करणाऱ्या मुलांच्या पोल्ट्री व्यवसायाला बसतो.


बर्ड फ्ल्यूचा बाऊ करू नका : सुनील केदार
बर्ड फ्ल्यूचा उगाच बाऊ करू नका, यानं माणसं मरत नाही. बर्ड फ्ल्यू असेल तिथे एक किलोमीटरचा परिसर सिल करायला सांगितला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत आहोत. बर्ड फ्ल्यू परदेशातील पक्षांकडून आला आहे. चिकन, अंडी रोज खा. 70 अंश सेल्सिअर तापमानावर त्याला अर्धा तास शिजवा आणि आरामात खा. चिकन, अंडी खाल्याने कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळते, असं मंत्री सुनील केदार म्हणाले आहेत.


राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव..
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. लातूर, यवतमाळ, ठाणे, बीड, अहमदनगर, रायगड, नंदूरबारसह अनेक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग हा परदेशी पक्षांमार्फत झाल्याचे सांगितले जात आहे. या संसर्गामुळे कावळे, बदक, मोर अशा पक्षांचाही जीव जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एखाद्या ठिकाणी बर्ड फ्ल्यूचा संसर्ग आढळल्यास एक किलोमीटरचा परीसर सील करण्यात येतो. शिवाय पोल्ट्री फार्म असेल तर पक्षांना गाडून टाकण्यात येत आहे.


Chicken Lunch | अहमदनगरमध्ये 'चिकन लंच'चं आयोजन, चिकन खाण्यासाठी सुरक्षित असल्याचा संदेश