Dussehra 2025: रावण... रामायणातील 'व्हिलन', सीतेचं अपहरण करणाऱ्या रावण म्हणजे एक खलनायक.. (Ravan Dahan 2025) अशीच आपल्या मनात प्रतिमा. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला (Dussehra 2025) दहन केलं जातं. मात्र, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका गावात चक्क याच रावणाची पूजा केली जाते. या गावात रावणाची पूजा का केली जाते?... रावणपूजेची अडीचशे वर्षांची या गावाची परंपरा नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊयात.
...आणि गावात लंकेश्वर 'रावण महाराज' स्थिरावले
रावणाची मनोभावे पूजा आणि आरती होत असल्याचं वाचून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल... अन तेही आपल्या महाराष्ट्रात होतं हे ऐकलं तर तुमचा विश्वासही बसणार नाही. मात्र, अकोला जिल्ह्यातल्या सांगोळा गावाने गेल्या अडीच शतकांपासून रावणपुजेची अनोखी परंपरा जोपासली आहे. फक्त परंपराच नाही तर या गावात 350 वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मुर्तीसुद्धा आहे. पातूर तालूक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे.
गावात रावणाच्या मुर्तीचं 'असं' झालं आगमन
सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे.. गावाला अगदी लागूनच गावाची जीवन वाहिनी समजली जाणारी मन नदी वाहते. या मूर्तीच्या आगमनामागची कथाही फार रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषी-मुनीचे आश्रम होते. अडीचशे वर्षांपूर्वी याच नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मुर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले. पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती... दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. मूर्ती घडवली, तिथे दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड होते. सिंदोळीचे झाड, अवचित घडलेली ही घटना अन त्यातून ‘लंकेश्वराची मूर्ती’ साकारल्या गेल्याचा हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर 'रावण महाराज' स्थिरावलेत.
सांगोळावासियांचं दैवत..
ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. मात्र, मूर्ती गावाच्या वेशीवरून समोर हललीच नाही. अन त्यामूळेच गावाच्या सुरुवातीलाच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या आख्यायिकेबद्दल माहिती ही लिखित नसून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. या घटनेनंतर गेल्या अडीच शतकांपासून 'रावण महाराज' सांगोळावासियांचं दैवत बनलं आहे. येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
एकदा झाला होता मुर्ती चोरण्याचा प्रयत्न
सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती 50-60 वर्षांपुर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात.
'रावण महाराज' सांगोळावासियांचं 'दैवत'
या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे. गाववासियांनी यावर्षी जुलै महिन्यातच यासंदर्भात अकोला जिल्हाधिकाऱ्यांना रावण दहनाविरोधात निवेदन दिले होते
रावणदहन न करण्याचा सांगोळावासियांचा आग्रह
दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. सितेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. त्यामूळे रावणातील चांगुलपणाला पुजत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांना वाटतं. .
रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही
रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही होते. मात्र, आजही त्याच्यातील सद्गुण दुर्लक्षित करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच... सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचा दहन करण्याची शपथ दसऱ्याला घेत देश बलशाली करण्याची भावनाच खरं 'सीमोल्लंघन' ठरेल.
हेही वाचा :
Shani Transit 2025: दसरा होताच 'या' 3 राशींची पाचही बोटं तुपात! शनिचा नक्षत्र बदल बनवणार कोट्यधीश, करिअर जोरात, बक्कळ पैसा येण्याचे संकेत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)