रायगड : दुष्काळ म्हटलं, पाणी टंचाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मराठवाडा आणि विदर्भच. पण आपल्याच महाराष्ट्रात जेथे पाण्याची मुबलकता मानली जाते त्या कोकण पट्ट्यातही हिवाळ्यानंतरच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणारी अनेक गावं आहेत. एकीकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी वणवण. महाराष्ट्रातल्या पाणीसमस्येचा वेध घेणारी एबीपी माझाची शोधयात्रा...पाण्यासाठी.


सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांना ग्रासणाऱ्या पाणीटंचाईचा वेध.... रायगडमध्ये तब्बल तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बारा महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. उन्हाळ्यातही तुडुंब भरलेल्या. पंचतारांकित रिसॉर्ट. हॉटेलची रेलचेल. वॉटरपार्कही. कोकणातील रायगड जिल्ह्याचं हे तसं लोकप्रिय चित्र. पाण्याची कसलीच ददात नाही असं वाटणाऱ्या याच रायगडात, दुसरं चित्र...काहीसं अनेकांना माहित नसलेलंच...मात्र धक्कादायक. घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून दऱ्या-खोऱ्यांमध्ये पायपीट करणारे डोंगरावरील गावकरी. सदोष बांधकामामुळे आहे ते जलस्त्रोतही बुजवून बांधल्यानं कोरडी पडलेली धरणं...शेतीबरोबरच सारंच गमावलेले सामान्य...तुडुंब भरलेलं धरण असतानाही पाण्यापासून वंचित ठेवलेला खारपट्टा...हे असं का...याचाच शोध घेण्यासाठी एबीपी माझाची दुष्काळ यात्रा.


एकीकडे साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराजांनी जलनियोजनाचं महत्व बजावून सांगितलेलं असतानाही...दुसरीकडे याच किल्ले रायगडापासून काही अंतरावर आहे...जलाची वाडी नावाचं गाव. या डोंगरांच्या रांगात दरीशेजारी वसलेल्या या गावातील पाणीटंचाईचा वेध घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहोचली... गावातील बरीच घरे चांगली बांधलेली...आम्ही पोहचलो तेव्हा गावात लग्नाची लगबग सुरु होती. पण तरीही अनेक गावकरी निघाले होते ते पाणी भरण्यासाठी. आम्हीही निघालो....आणि सुरु झाला एक भयावह प्रवास...उतरती वाट...पायाखाली दगड धोंडे...एका बाजूला काटेरी झाडे. दुसऱ्या बाजूला खोल दरी... अशा वातावरणात चालताना पायाखाली वाळलेल्या पानांचा तुटण्याचा होणारा आवाज मनाला उगाचच काहीसा भीतीदायक वाटणारा.


दोन किलोमीटर पायपीट. उतरती पायवाट तुडवत दरीच्या तळाला पोहोचलो तर तिथं जे दिसलं ते पाहून बारामाही नद्या वाहणारा रायगड जिल्हा तो हाच, यावरचा विश्वासच उडाला.

गावातून खाली दरीत उतरताना गावकरी म्हणाले होते, खूप चालावं लागेल. पाय घसरतो. पण काय करणार नदी तिथंच आहे. सर्व त्रास सहन करत जेव्हा गावकऱ्यांसोबत खाली उतरलो तेव्हा समोर होती ती नदी नव्हतीच. ओहोळही नव्हता. तलावही नव्हता. होतं एक डबकं. थोडं बरं तर बरचसं गढूळ पाणी असलेलं. केवळ पावसाळ्यात तेथून नदीसारखा प्रवाह वाहतो म्हणून गावकरी नदी म्हणतात.



तेथेच एक विहीर होती. ते पाणी का नाही घेत विचारलं तर गावकरी म्हणाले आत पाहा. फार काही चांगलं नव्हतंच ते. गावकऱ्यांचा आणखी एक राग आहे. त्या विहिरीचे बांधकाम या डबक्याला जास्त पाणी देणाऱ्या झऱ्यावर झाले आहे. तसंच विहीर बांधताना गावकरी खूप राबले होते. ज्या भांड्यामधून पाणी नेतात त्याच भांड्यांमधून घरी पाणी ओतून खाली येताना रेती, विटा आणायचे. सिमेंटच्या गोण्या पाठ मोडीपर्यंत वाहिल्या. राबराब राबले. विहीर झाली आणि मग अधिकाऱ्यांनी नळाद्वारे पाणी गावात काही पोहोचवलेच नाही. आपल्याला फसवल्याच्या भावनेनं गावकऱ्यांचा राग.


आता पुरेसं पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांना डबक्याच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. काही जणांनी ते पाणी हंड्यांमध्ये, छोट्या कळशांमध्ये भरलं. मी त्यांना विचारलं हे असं पाणी तुम्ही पिता कसं? त्याने बोट दाखवलं...काही गावकरी ते पित होते. तसंच न गाळलेलं. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले काही होत नाही. त्यांनी डबक्याकडे बोट दाखवलं तर एक गावकरी थेट डबक्यातून ते पाणी पित होता. कसलं आरोग्य आणि कसलं काय. जगायचं कसं हा प्रश्न समोर असताना काय सांगणार त्यांना!


कुणीच काही करत नाहीत. फक्त मतांसाठी येतात. पण पाणी काही देत नाहीत. पण सरकारी यंत्रणेनं काहीच केलं असंही नाही. सरकारी यंत्रणेनं टाक्या बांधल्याही. पण त्यातील पाणी गावासाठी सोडले नाही. गावकऱ्यांना कळतच नाही सरकार असं वागतंय तरी का?


प्रचंड पाऊस पडणारा रायगड जिल्हा....त्याच रायगडातलं नावापुरतंच पाणी उरलेलं जलाची वाडी गाव. लाज आणणारं. रायगडमध्ये महामूर पाणी. पण तेथेच हे पाण्यासाठी तडफडणारं. विकासाच्या लखलखाटातील अंधाराची बेटंच ही. कधी या अंधाराच्या बेटांचं भाग्य उजळणार...

VIDEO | रायगडमधील तहानलेल्या 'जलाच्या वाडी'ची गोष्ट | दुष्काळयात्रा | भाग 1 | एबीपी माझा