Nitin Gadkari: नाशिकमधील रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्व पूर्ण प्रकल्प राबविण्यात येतील. यामध्ये नाशिकरोड ते द्वारका चौक यामार्गावर 6 किमीच्या डबल डेकर उड्डाणपुलाच्या कामाला 1600 कोटींच्या निधीसह मंजुरी देण्यात आल्याची महत्वाची माहिती मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 


आज इगतपुरी येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांचेमार्फत आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या 226 किमी लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, मी आपल्याला विश्वास देवू इच्छितो की, रोड, रेल्वे आणि ॲव्हिएशन यांचा उपयोग करून आयात-निर्यातीचं प्रमुख केंद्र नाशिकला बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ची निर्मिती केली गेली त्याचवेळी मुंबई-नाशिक या हायवेचाही त्याच धर्तीवर विकास करण्याचा मानस होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो त्यावेळी होवू शकला नसला तरी समृद्धी महामार्ग नाशिकमधून गेल्याने तो मानस आज पूर्ण होताना दिसतो याचा आनंद निश्चितच आहे. येणाऱ्या काळात या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.


नांदगाव ते मनमाड या भागात 253 कोटी रूपयांची कामे झाली आहेत. या कामांमुळे सुरत-नागपूर हा महामार्ग धुळे-औरंगाबाद-सोलापूर हा साक्री-शिर्डी यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या महामार्गामुळे जळगाव-नाशिकमधील संपर्क सुधारणार असून त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. त्याचबरोबर मनमाड येथील पाणेवाडी येथील बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या डेपोंना आसपासच्या शहराला जोडणे सहज शक्य झाले आहे. नाशिकला अपघातमुक्त शहर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याची अपेक्षाही यावेळी श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.


दरम्यान नाशिक जिल्ह्यातील 7 कामांचे भूमिपूजन झाले, त्यांची लांबी 205 किलोमीटर इतकी आहे. त्यासाठी 1577 कोटी रूपयांची ही कामे आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातीलही महत्वाच्या कामांचा त्यात समावेश आहे. गोंदे ते पिंप्री सदो सेक्शनचे सहा पदरीकरण हे आपण आज करतो आहोत. समृद्धी महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वडपे पर्यंत वाहतुक मोठ्या प्रमाणात असणार आहे. या भागात खर्डी एमआयडीसीत लॉजिस्टिक पार्क मोठ्या प्रमाणात आहेत. वडपे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग व मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग एकत्र येतात, त्यामुळे येणाऱ्या काळात वडपे हे महत्वाचे जंक्शन होणार आहे. जे.एन.पी.टी. ला त्याचा थेट फायदा होण्याबरोबरच येथील आयात निर्यात अधिक सुलभ व जलदगतीने होणार आहे. येथून आपण दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात सहज आणि जलदगतीने पोहोचणार आहोत, त्यामुळे नाशिकचे महत्व अधिकच वाढणार आहे. 


नाशिकसाठी सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महत्वाचा


त्याचबरोबर सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस असून या महामार्गामुळे फार मोठी क्रांती या भागात होणार आहे. त्याची किंमत जवळपास 80 हजार कोटी इतकी असून त्यातील नाशिक जिल्ह्यात 10 हजार कोटींच्या रस्त्याचे काम होणार आहे. 1290 किलोमीटरचा हा मार्ग 10 तासात चेन्नईमध्ये आपल्याला पोहोचवणार आहे. त्यामुळे नाशिकहून दक्षिणेत जाण्यासाठी उत्तम सोय होणार आहे. हा महामार्ग नाशिक-अहमदनगर-बीड-उस्मानाबाद- सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रात याची लांबी 482 किलोमीटर इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात तो 122 किलोमीटर इतका असणार आहे.