कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजर्षी शाहू महाराज यांचे जनक घराणं आता आक्रमक झाले आहे. 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' अंतर्गत 7 आठवडे अभियान सुरू केलं जाणार आहे. येत्या 6 तारखेपासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. समरजितसिंह घाटगे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. सत्तेत येण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी सत्तेत आल्यावर पूर्ण करा, इतकीच माफक अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली आहे.


पश्चिम महाराष्ट्र हा सधन शेतकऱ्यांचा भाग आहे. त्यामुळे इथले शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत असतात. सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना झाला नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती.


मात्र आता त्याला चार महिने झाले अजून शेतकऱ्यांना एक पैसे देखील देण्यात आला नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देणार होते त्याचे काय झाले असा सवालचं समरजित यांनी केला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही भरपाई लवकरात लवकर मिळावी, कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीपेक्षा या वर्षी जास्त नुकसान झाले आहे.


लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे आणि दरवाढ देखील मागे घ्या अशी मागणी घाटगे यांनी केली आहे. इतक्या पटीने वीज बिल वाढण्याची ही पहिलीच वेळ असून ती मागे घ्यावी. एका गावामध्ये तर घर पावसामुळे पडले तरी देखील त्यांना वाढीव बिल आलं हे कसं काय? असा सवाल देखील समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.