अहमदनगर : नामदेवशास्त्रींच्या विरोधानंतरही भारजवाडी ग्रामपंचायतीच्या भागात मेळाव्याला परवानगी मागणाऱ्या कृती समितीला जिल्हा प्रशासनाने रेड सिग्नल दाखवला आहे. कायद आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याच्या पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.


भगवानगड दसरा मेळावा कृती समितीला जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. भगवान गडाच्या आतमध्ये दसरा मेळाव्यास जिल्हा प्रशासनास परवानगी नाकारली आहे. जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय पंकजा मुंडेंना मोठा दणका असल्याचं मानलं जातं आहे.

भगवान गडाच्या हद्दीत 40 गुंठे जागा भारजवाडी ग्रामपंचायतीची असून, तिथे कृती समितीकडून दसरा मेळाव्याला परवानगी मागण्यात आली होती. ग्रामपंचायतीने 6 तारखेला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता.