नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरआहेत. काल अमित शाह, पंतप्रधान मोदी यांच्या भेटी घेतल्यानंतर आज ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनाही भेटले. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकी काय राजकीय खलबंत शिजत असल्याची चर्चा सुरु आहे. लवकरच भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी गठीत होणार आहे. त्याचीही चर्चा यानिमित्तानं सुरु आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांनी जानेवारी 2020 मध्ये सूत्रं स्वीकारली. नव्या अध्यक्षासोबत नवी टीमही बनते. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होऊ शकते अशी चर्चा आहे. साधारण 120 सदस्य देशभरातून या कार्यकारिणीत असतात. त्यातल्या काही सदस्य तर काहींना संघटनात्मक महत्वाची जबाबदारी दिली जाते.


महाराष्ट्रातल्या राज्य कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान नव्हतं, तेव्हाच पंकजा मुंडेंना आम्ही राष्ट्रीय पातळीवरचं पद देऊ असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पंकजांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय आशिष शेलार यांच्याकडे संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशीही चर्चा आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष होते. शिवाय महाराष्ट्राबाहेरच्या अनेक निवडणुकांमध्येही त्यांनी आपलं संघटनात्मक कौशल्य दाखवलं होतं. सोबत आधी कार्यकारिणीवर असलेल्या एकनाथ खडसेंचं काय होणार याचीही उत्सुकता असेल.


या संघटनात्मक बदलात आणखीही चर्चा आहे. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या रिक्त जागा भरण्याची आणि पक्षासाठी सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या या समितीत सध्या आठच सदस्य आहेत. अनंतकुमार, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या निधनानंतर आणि व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर या चार जागा रिक्त आहेत. या रिक्त जागेवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य आहेत. सुषमा स्वराज यांच्या जाण्यानंतर एकही महिला समितीत नाही. त्यामुळे निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांच्या समावेशाचीही शक्यता आहे. त्यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील पार्लमेंटरी बोर्डात येऊ शकतात. तसं झाल्यास गडकरी, फडणवीस हे महाराष्ट्राचे दोन नेते पार्लमेंटरी बोर्डात असतील.


देवेंद्र फडणवीस हे बऱ्याच दिवसानंतर दिल्लीत आले. येताना त्यांच्यासोबत जे नेते आले ते सगळे भाजपचे आयात नेते होते. कोरोनाच्या मुद्द्यावर ही बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं. पण सोबतच इतर राजकीय मुद्दे, संघटनात्मक बदलही त्यांच्या अजेंड्यावर होते यात शंका नाही. संघटनात्मक बदल काही दिवसांतच आपल्याला प्रत्यक्षात आलेले दिसतील. पण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राबाबत त्यांनी नेमकी काय चर्चा श्रेष्ठींसोबत केलीय हे तूर्तास तरी गुलदस्त्यातच आहे.


BJP Central Committee | पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत?