ठाणे : माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचविल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.


हरियाणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात नुकतेच हे मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यातून केवळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली होती.

प्रथम क्रमांक पाटणा, द्वितीय क्रमांक इंदौर, तृतीय क्रमांक गांधीनगर जिल्ह्यांना मिळाला.

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इंफॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा वापर शासकीय सेवा पुरवितांना करणा-या देशभरातील  जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी डिजिटल चॅम्पियनशिप अवार्ड दिले जाते.

देशात ठाणे चौथ्या क्रमांकावर

देशातील एकूण 60 जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्हयातील जी-टू-सी (गव्हर्नमेंट ते सिटीझन) सेवांबाबत केलेल्या कामकाजाबाबतचा स्पर्धेत सहभाग घेतला होता.

ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या सेवा नागरिकांपर्यंत पोहचविण्यावर चांगले काम सुरु आहे. विशेषत: ठाणे सहज मोबाईल ॲप, तहसिल कार्यालयात उभारण्यात आलेले वर्क स्टेशन्स ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रिकॉर्ड रूम, डिजी-धन:कॅशलेस इनिशिएटीव्ह, आपले सरकार पोर्टल व सोशल मिडियाचा वापर हयाबाबत गाव पातळीवर काम झाले असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पर्धेसाठी आपले नाव नोंदविले होते.

60 जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी होऊन केवळ 16 जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज अंतिम फेरीसाठी वैध ठरविण्यात आले होते. त्यात ठाणे जिल्हयाचा क्रमांक 4 वर होता. स्पर्धेतील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुरजकुंड मेला ग्राउंड, हरीयाना येथील  आर्ट मेळयामध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता.

ठाणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम, व तहसिलदार समीर घारे, यांनी प्रतिनिधित्व केले व योजनांबाबत माहिती दिली.

डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी निगडीत शासकीय अधिकारी तसेच या क्षेत्रात काम करणा-या सेवाभावी संस्था तथा अन्य मान्यवर परीक्षकांनी तपासणी करून ठाणे जिल्हयास उत्तेजनार्थ बक्षीस घोषित केले. त्यामध्ये सन्मानपत्र व ट्रॉफी यांचा समावेश आहे.