‘या प्रकरणात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही 15 आरोपींचा शोध सुरु आहे,’ अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी दिली आहे.
प्रकरण काय आहे?
मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन संतप्त जमावाने 1 जुलैला पाच जणांची हत्या केली होती. साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर ही खळबळजनक घटना घडली. राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलै रोजी दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.
मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, आप्पा श्रीमंत भोसले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.
दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांतही मुलं पळवण्याच्या अफवेवरुन अनेकांना मारहाण करण्यात आली होती.