मुंबई : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यशवंत सेनेचे अध्यक्ष पांडुरंग गडदे याच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.


सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. पण ते आश्वासन न पाळल्याने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती आंदोलकांनी दिली.

दरम्यान या मोर्चासाठी परवानगी न  घेतल्याने सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरलं. मात्र आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पुढे आझाद मैदानाकडे मोर्चेकऱ्यांना जाऊ देण्यात आलं.

पोलिसांनी अडवल्यानंतर मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये बराच शाब्दिक वाद झाला. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाऊ दिलं.

सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार नाही केला तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.