खरा दे धक्का 24 तारखेला कळेल, धनंजय मुंडेंचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2018 05:12 PM (IST)
खरा दे धक्का काय असतो ते 24 तारखेला म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालालाच कळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबई/लातूर : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश कराड यांनी विधानपरिषद उमेदवारीचा फॉर्म मागे घेतला. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र खरा दे धक्का काय असतो ते 24 तारखेला म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालालाच कळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे. ''भाजपने उमेदवारी न दिल्याने रमेश कराड नाराज होते. त्यांना आम्ही पक्षात घेतलं, उमेदवारीही दिली. त्याबद्दल त्यांनी कृतघ्नता व्यक्त करायला हवी. मी चेकमेट झालेलो नाही, अभी तो खेल शुरु हुआ है,'' असंही धनंजय मुंडे म्हणाले. विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. संबंधित बातम्या :