Beed: राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलच तापलंय. बीडच्या नियोजन समितीच्या बैठकीनंतर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडी मुक्कामी जाऊन आल्यानंतर या प्रकरणात आता संत महंतांनीही उडी घेतली आहे. या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdeo Shastri)यांनी  धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100 टक्के खात्रीने सांगतो असं वक्तव्य केल्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता महंत नामदेव शास्त्रींशी भेट घेणार आहेत. (Dhananjay Deshmukh)


संतोष देशमुखने ज्या आरोपीला चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपीवर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला 10 चापट मारल्या असत्या तरी चाललं असतं, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ही भेट महत्वाची ठरणार आहे. (Santosh Deshmukh Case)


धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार महंतांकडे


गेल्या 53 दिवसांपेक्षा अधिक दिवस या प्रकरणाला होत आहेत. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून नागरिकही रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावरून दबाव वाढत असताना महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय महंत नामदेव शास्त्रींना भेटण्यासाठी उद्या (2 फेब्रुवारी) भगवानगडावर जाणार आहेत.संतोष देशमुख हत्याप्रकरणातले सर्व पुरावे ते महंतांना देणार आहेत. धनंजय देशमुख यांचं म्हणणं असं आहे की हे पुरावे महंतांना देऊन त्यांच्याकडे न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.


मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिल्याचे चित्र दिसून येत असलं तरी महंत नामदेव शास्त्रींनी समोर येऊन मांडलेल्या भूमिकेनंतर धनंजय मुंडेंनीही समाधान व्यक्त केले.माझ्या अडचणीच्या काळात भगवानगड पाठीशी उभा राहिल्याचं ते म्हणाले. बीडच्या राजकारणात भगवानगडाचं मोठं महत्व आहे. महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही त्यांच्याकडचे सर्व पुरावे महंत नामदेव शास्त्रींना देणार आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख व कुटुंबियांची महंतांशी भेट महत्वाची ठरणार आहे.


धनंजय देशमुख काय म्हणाले होते?


एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता तुमची असेल तर तुम्ही समाजाचं देणं लागत नाहीत हे स्पष्ट झालंय. पण, अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुदडे पडतील, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून 18 पगड जातीचे लोक संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून ही विकृती असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले.


हेही वाचा:


... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल