नागपूर : महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार आहे असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजप उमेदवार संदीप जोशींच्या प्रचारासाठी आयोजित पदवीधर मेळाव्याला संबोधित करत होते.


ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः घोषणा करत बिलं कमी करू असे जाहीर केले होते. नुसते ऊर्जा मंत्री बोलले नव्हे तर तर तिन्ही पक्षाचे नेते कॅबिनेट नंतर मीडिया समोर आले होते आणि घोषणा करत फोटो काढले होते. टीव्ही वर झळकले होते, आता मात्र सर्व पलटले अशी टीका ही फडणवीस यांनी केली. आता ऊर्जा मंत्री म्हणतात माझा अभ्यास नव्हता, 59 हजार कोटींची थकबाकी आहे हे मला माहित नव्हते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका वर्षात विदर्भात आले नाही. हे विदर्भ, मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्र, कोकण साठी काम करणारे सरकार नाही. मुख्यमंत्री एका भागासाठी काम करतात, उपमुख्यमंत्री त्यांच्या भागासाठी काम करतात मात्र महाराष्ट्रासाठी कोण काम करेल असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.


या सरकार मध्ये कोणताही मंत्री उठतो आणि घोषणा करून टाकतो. जनतेचे कामं मात्र कधीच होत नाही. नुसत्या बदल्यांचा धंदा चालवला आहे. या सरकारमध्ये दलाल सक्रिय झाल्याचा आरोप ही त्यांनी केला. ही निवडणूक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निवडणूक आहे. ही निवडणूक या सरकारच्या काळ्या कारनाम्यांना नाकारण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदींच्या चांगल्या कामांना पाठिंबा देण्याची निवडणूक आहे. भाजप उमेदवार संदीप जोशी यांना मोठ्या मताधिक्याने निवडणून द्या असे आवाहन फडणवीस यानी उपस्थित मतदारांना केले.