Devendra Fadnavis On OPS: जुन्या पेन्शन योजनेवरुन (Maharashtra Old Pension Scheme:) वरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीची लाजच काढली आहे. नागपुरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यांचा कौतुक करावंसं वाटतं. कारण त्यांना लाजच वाटत नाही. पेन्शनचा प्रश्न त्यांनीच निर्माण केला आहे. 2010 मध्ये त्यांनीच पेन्शन बंद करण्याची योजना लागू केली. त्याच्या आधीही त्यांचं सरकार होतं आणि त्यानंतरही त्यांचंच सरकार सत्तेवर होतं.  त्यांनी जुनी पेन्शन बंद केली, नवीन पेन्शनची योजना लागू केली आणि आता भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर असं वातावरण निर्माण करत आहेत, जणू भाजपनेच पेन्शन रद्द केली आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 


फडणवीस म्हणाले की, पेन्शनचा निर्णय तडकाफडकीने घेतला जात नाही. कारण आपल्याला शिक्षकांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं सर्वांचं भवितव्य पाहायचं आहे.  जुन्या पेन्शनचा निर्णय घेतला तर अडीच लाख कोटीचा बोजा पडेल. तसं झाल्यास पगारही देता येणार नाही. त्यामुळे मी सांगितले की आम्ही या संदर्भात विचारपूर्वक निर्णय करू. तुम्ही जुनी पेन्शन योजना आज लागू करा असे म्हणणार असाल तर आज राज्याची परिस्थिती तशी नाही.  मात्र भविष्यात नक्कीच राज्याचा आर्थिक विकास होऊन तशी स्थिती निर्माण होईल, ज्या वेगाने आपण थ्री ट्रिलियन इकॉनोमीकडे वाढतो आहे नक्कीच तशी अवस्था येईल, असंही फडणवीस म्हणाले. 


विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आणि भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणूक रणनीती संदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.  


आजकाल काही आमदारांचं विमान एक-दोन वर्षांमध्येच जमिनीवर उतरत नाही


ते म्हणाले की, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची जागा वर्षानुवर्षे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लढते आणि भाजप त्याच पाठिंबा देते. यावर्षीही आपण आपलं समर्थन जाहीर केलं आहे. गाणार सर गेले बारा वर्ष काम करत आहेत. आमदार  होण्यापूर्वी त्यांचं व्यवहार, वर्तन, कामाची पद्धत जशी होती, ती आमदार झाल्यानंतर ही बदललेली नाही. नाहीतर आजकाल काही आमदारांचं विमान एक-दोन वर्षांमध्येच जमिनीवर उतरत नाही. मात्र गाणार यांच्याबद्दल तसे झाले नाही. गाणार यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा गैरव्यवहाराचा डाग लागलेला नाही. गाणार शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत प्रश्न आवर्जून उचलून धरतात. नाहीतर काही शिक्षक आमदार (सर्वच नाही) असे आहेत की त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांऐवजी बिल्डरांच्या प्रश्नांमध्ये जास्त रस असतो.  मात्र गाणार फक्त आणि फक्त शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात, असं फडणवीस म्हणाले. 


ही बातमी देखील वाचा


OPS: हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल