मुंबई: “विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी, फडणवीस सरकारला काहीही फरक पडणार नाही”, असं दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर खुद्द भाजप खासदार नाना पटोले यांनी सांगितलं.


ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते. नाना पटोले यांच्यासोबतचा ‘माझा कट्टा’ शनिवारी रात्री 9 वा. एबीपी माझावर प्रसारित होईल.

भंडारा-गोंदिया मतदार संघातील भाजप खासदार नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी, फडणवीस सरकार, शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल दरवाढ यासह विविध मुद्द्यावर आपली मतं मांडली.

फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा
यावेळी नाना पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सरकार हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आलं आहे. सर्वात आधी म्हणजे निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. आवाजी मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीने विधानसभेत पाठिंबा दिल्याने, दप्तरी नोंद भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा अशी झाली आहे. त्यामुळे सध्याचं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर नाही तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे.”

2014 मध्ये विधानसभेत नेमकं काय झालं होतं?
महाराष्ट्रात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, 122 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर 63 जागांसह शिवसेना दुसऱ्या स्थानी होती. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. सुमारे 25 वर्षांची शिवसेना-भाजप युती तुटली होती.

त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर 145 गाठण्यासाठी कोणाची तरी मदत घेणं आवश्यक होतं. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

12 नोव्हेंबर 2014 रोजी काय झालं?

अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

मात्र याला शिवसेनेनेसह काँग्रेसने आक्षेप नोंदवत मतविभाजन करण्याची मागणी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची मागणी फेटाळली. कोणत्या पक्षाची किती मतं हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेने मतविभागणीची मागणी केली होती.

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी
सभागृहात गोंधळ सुरु असतानाच, नवनिर्वाचित अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली होती. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली होती.

राष्ट्रवादीचा ठपका पडू नये म्हणून खेळी केल्याचा आरोप
देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता, मात्र तो ठपका लपवण्यासाठी भाजपने आवाजी मतदानाची खेळी केल्याची चर्चा, त्यावेळी होती.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे बहुमत नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा असं आव्हान दिलं होतं. आवाजी मतदानावेळी कोणीच पोलची मागणी केली नाही, त्यामुळं आता कांगावा करणारे, तेव्हा काय करत होते असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विचारलं असता, "राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं त्यांचा आम्हाला पाठिंबा आहेच, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची मदत झाल्याचं स्पष्ट केलं होतं".

त्यामुळं निवडणुकीत राष्ट्रवादीवर टीका करत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या भाजपला शिवसेनेचा विरोध होत असताना राष्ट्रवादीनंच तारल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं.

संबंधित बातम्या

..तर आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आव्हान

देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

बहुमतासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याने भाजप नगरसेवकाचा राजीनाम्याचा इशारा